Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

भर पावसात अजमेरमध्ये देवेंद्र फडणवीसांची दणदणीत सभा

By Devendra Fadnavis on September 14th, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

अजमेर, 14 सप्टेंबर

केवळ सत्ता परिवर्तन नाही, तर लोकांच्या जीवनात परिवर्तनासाठी भाजपा!

राजस्थानमधील विविध परिवर्तन यात्रांमध्ये सहभागी होताना, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा तिसरा दिवस पुष्कर ते अजमेर अशा प्रवासाचा होता. रात्री अजमेरमध्ये भर पावसात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

आज तिसर्‍या दिवशी केकडी, नसिराबाद, किशनगड, अजमेर ग्रामीण आणि अजमेर शहरात त्यांनी जाहीर सभांना संबोधित केले. या दौर्‍यात सी. पी. जोशी, विजयाताई रहाटकर आणि अन्य स्थानिक नेते त्यांच्यासोबत होते. परिवर्तन रथात सुद्धा जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात आले. आजच्या दिवसाची सुरुवात करताना त्यांनी पुष्कर येथील ब्रम्हदेवाच्या मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली आणि मनोभावे दर्शन घेतले.

या जाहीर सभांमध्ये संबोधित करताना ते म्हणाले की, राजस्थानात भाजपाला जे परिवर्तन घडवायचे आहे, ते परिवर्तन म्हणजे केवळ सत्ता परिवर्तन नाही. सत्ता परिवर्तन म्हणजे एक मुख्यमंत्री बदलून दुसरा किंवा एक मंत्री बदलून दुसरा मंत्री असे नाही. तर दलित, पीडित, शोषित, सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी हे परिवर्तन हवे आहे. हे समाज परिवर्तनाचे मिशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 कोटी लोकांच्या जीवनात मोठे परिवर्तन केले आणि त्यांना गरिबी रेषेतून बाहेर काढले.

आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे 6000 रुपये दिल्लीतून निघतात, तेव्हा ते पूर्ण 6000 रुपये थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जातात. राजीव गांधी म्हणायचे, पूर्वी 85 पैसे दलाल घ्यायचे आणि 15 पैसे सामान्य माणसाला मिळायचे, आज दलालांची संपूर्ण यंत्रणा नष्ट करण्याचे काम मोदीजींनी केले आहे. अशोक गहलोत यांचे जागोजागी होर्डिंग लागले आहेत. त्यांनी 2030 पर्यंत राजस्थानला नंबर 1 चे राज्य बनविण्यासाठी लोकांकडून सूचना मागितल्या आहेत. त्यांना एकच सूचना द्या, तुम्ही बाजुला व्हा, राजस्थान आपोआप क्रमांक 1 वर येईल. आज केंद्राचा मोठा निधी राजस्थानला मिळतो आहे. पण, तो पूर्ण भ्रष्टाचारात जात आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.