
मुंबई, दि. 28 जुलै
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना
नागपूर ‘तरुण भारत’चे माजी मुख्य संपादक ल. त्र्यं. उपाख्य लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक मोठे चिंतनशील, व्रतस्थ व्यक्तिमत्त्व, विविध विषयांचे गाढे अभ्यासक आपल्यातून हरपले आहेत, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
राजकारण, सिंचन अनुशेष हे त्यांच्या आवडीचे विषय होते. पत्रकार म्हणून एखादा प्रकल्प दत्तक घेत त्यावर सातत्याने लिखाण करण्याची परंपरा त्यांनी सुरु केली. गोसिखुर्द प्रकल्पावर त्यांनी विपुल लेखन त्याच परंपरेत केले होते. तरुण भारतात त्यांची प्रदीर्घ कारकिर्द झाली आणि तेथूनच ते निवृत्त झाले. पण, त्यानंतरही गोवा आणि इतर ठिकाणी विविध वृत्तपत्रात त्यांनी संपादक म्हणून आपली कारकिर्द गाजवली. त्यानंतरही समाजमाध्यमांवर सातत्याने त्यांनी आपली लेखणी जिवंत ठेवली. संपादकपदावर असतानाही हाडाचा पत्रकार कशाला म्हणतात, त्याचे ते मूर्तिमंत होते. माझ्या वडिलांच्या काळापासून त्यांचा परिचय होता. त्यामुळे सातत्याने त्यांचे मार्गदर्शन असायचे. एक अभ्यासू आणि पितृतुल्य व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने मी गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
